मुंबईः प्रतिनिधी
पुण्यात झालेल्या आत्महत्या प्रकरणात कोणतीही सुसाईड नोट नव्हती. तसेच त्याविषयीची तक्रारही कोणाची नाही. चव्हाणच्या आई-वडीलांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास दाखविला असतानाही विरोधकांकडून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आत्महत्येबद्दल मागणी करत असताना मात्र मुंबईत सातवेळा निवडूण आलेल्या खासदाराने भाजपातील उच्च पदस्थांची नावे घेत आत्महत्या केली. त्यांनी तर सुसाईड नोट लिहीली त्याबाबत का कोणी विचारत नाही ? असा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विचारत याप्रकरणाची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगत अप्रत्यक्ष भाजपाला इशारा दिला.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते.
सातवेळा निवडूण आलेल्या खासदारावर आत्महत्येची वेळ येणे, भाजपामधील जी काही उच्चपदस्थ आहेत त्यांच्यावर कारवाईबाबत बोलत नाही. त्यात तर सुसाईड नोट आहे. राठोंडाबाबत सतत विचारणा होते मग त्या आत्महत्येबद्दल का बोललं जात नाही भाजपामधील वरिष्ठ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी का होत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना माझी विनंती मुंबई पोलिसांना चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत.
पूजा चव्हाणप्रकरणी संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी होवून संबधितांवर कारवाई करण्यात येईल. आरोपीला मोकळे सोडले जाणार नसल्याची ग्वाही देत झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र काहीजणांकडून सत्तेत नाही म्हणून वाटेल ते आरोप करण्याचे प्रकार सुरु आहेत. हे योग्य नसून पोलिसांकडून योग्य तो तपास करण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सीडीआरही नोंदविला असल्याचे मुख्यमंत्र्यांबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
यावेळी अनिल परब यांनी संजय राठोड यांनी दिलेले राजीनामा पत्र आणि पूजा चव्हाण हिच्या आई-वडीलांचे पत्रही वाचून दाखविले.
विरोधई पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मला फुकटचा सल्ला दिला. मला हे ऐकून बरे वाटले. भाजपावाले किमान काही तरी फुकट देतायत हे ऐकून. पण स्वा.सावरकर यांच्याबद्दल बोलताना किमान त्यांची जयंती कि पुण्यतिथी हे माहिती घेवून बोलायला पाहिजे असे सांगत आधी त्याची माहिती करून घ्या त्यानंतर बोला असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.
तसेच फडणवीसांनी आमचे सरकार खोटे आणि लाचार असल्याची इतिहासात नोंद होईल असे बोलले तर माझेही सांगणे आहे की, तुमच्या काळात देश भंगारात काढून विकायला काढल्याची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रत्तितुर देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीसांना दिले.
सीमाप्रश्नी सरकारसोबत असल्याचे सांगितले आता तर केंद्रात तुम्ही, कर्नाटकात तुम्हीच सत्तेवर आहात. पूर्वीही तुम्ही महाराष्ट्रात सत्तेत होतात. मग त्यावेळी का सोडविला नाही सीमाप्रश्न असा सवाल विचारत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आता आमच्या सोबत आहात तर सांगा तुमच्या केंद्राला आणि कर्नाटकातील सरकारला दोघं मिळून सीमावासियांचा प्रश्न सोडवू असे आव्हान फडणवीसांना देत दुतोंडी भूमिका घेवू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. परंतु याच कोरोना काळात धारावी पॅटर्नची चर्चा जगभरात झाली. परंतु विरोधकांनी त्याची आठवण झाली नाही. ज्या काही सोयी-सुविधा केल्या ते काही दिसलं नाही. फक्त भ्रष्टाचार झाल्याचे तेवढे दिसले असा उपरोधिक टोला लगावत असे आरोप करून किमान कोरोना योध्द्यांचा अपमान तरी करू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून काही ठराविक हिस्सा राज्यांना मिळत असल्याचे सांगितलं जातंय. पण केंद्राने अशी काही करांमध्ये दरवाढ केलीय कि राज्यांना त्यांचा हिस्सा मिळत नसल्याचे सांगत अद्यापही जीएसटीपोटी राज्य सरकारला ३९ हजार कोटी रूपयांचा निधी दिला गेला नाही. याप्रश्नावर विरोधक काही बोलत नाही. त्याबद्दल का नाही विचारत केंद्राला जाब? असा उपरोधिक सवाल करत जबाबदार पदांवर असणाऱ्यांनी तर असे खोटे बोल पण रेटून बोल असे बोलू नये असा टोलाही त्यांनी लागवला.
Marathi e-Batmya