मुंबई: प्रतिनिधी
राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत निधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आजही करत आहेत. मात्र राज्यातील भाजपाच्या नगरसेवक, आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्याऐवजी केंद्राच्या पीएम केअर फंडाला मदत दिली. अगदी त्याच धर्तीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाही त्यांनी डाक विभागाच्या मदतनिधीत मदत दिल्याने राजकिय वर्तुळात पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.
संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे सर्व आर्थिक, व्यवसायिक केंद्रे बंद राहीली. या कालावधीत राज्याच्या तिजोरीत महसूल जमा होवू शकला नाही. त्यामुळे राज्यातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करणे जिकरीचे बनत चालले आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी छोटीशी रक्कम मोठी ठरत आहे.
यापार्श्वभूमीवर भाजपाच्या नगरसेवक, आमदार, खासदारांनी केंद्राच्या निधीत घातलेली भर आणि त्यातील निधीत वाढ व्हावी यासाठी सर्वांना पुन्हा आवाहन करणे यामुळे राज्यातला विरोधी पक्ष राज्य सरकारबरोबर नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच आता राज्यपालांनी त्यांना मिळालेल्या २५ हजार रूपयांच्या बक्षिसात स्वत:चे ७५ हजार रूपये घालून १ लाख रूपयांचा निधी डाक विभागाच्या कोरोनाग्रस्तांसाठी दिला.
त्यांच्या या कृत्याबाबत राजकिय वर्तुळात पुन्हा आर्श्चय व्यक्त करत राज्यपालांनी थोडासा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत द्यायला हरकत नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
डाक विभागातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले.
राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्विकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखिल उपस्थित होते.
डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या रकमेत स्वत:चे ७५००० रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील करोना बाधित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.
Marathi e-Batmya