दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे शिष्टमंडळ गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांचा समावेश राहणार आहे. या भेटीबाबत अधिक माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिला या घटकांसाठी होणारी अर्थसंकल्पीय तरतूद सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे या घटकांसाठी असलेल्या शासकीय योजनांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. एक तर अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत किंवा त्याच्या निधीमध्ये मोठी कपात झाली आहे.

या सरकारच्या कार्यकाळात वैचारिक कट्टरवादाला राजाश्रय मिळाला आहे. त्यामुळे अशा संघटना नियोजनबद्ध विविध समाजांमध्ये फूट पाडून सामाजिक सलोखा व सौहार्दतेला तडा देत आहेत. अशा सर्व बाबींकडे राज्यपालांचे लक्ष वेधून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अभिभाषणात याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही या शिष्टमंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *