“कोणीही तुमच्याकडे येऊन वेगळा पाठिंबा असल्याचं सांगितलं, तरी गाफील राहू नका. आपला पाठिंबा फक्त आणि फक्त महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच आहे,” असा स्पष्ट आणि ठाम संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना दिला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार दौरा आणि रॅलीला संबोधित करताना त्यांनी विरोधकां जोरदार प्रहार केला.
दरम्यान, या प्रचार दौऱ्याला आणि रॅलीला सर्व स्तरांतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहता महायुतीच्या प्रचाराला मिळत असलेला वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे.
महायुतीच्या उमेदवारांसाठी एकजुटीचं आवाहन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात आहेत. मात्र मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा देऊन भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन यांनी केले.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, “या निवडणुकीत केवळ उमेदवार निवडायचे नाहीत, तर ठाण्याच्या विकासाची दिशा ठरवायची आहे. त्यामुळे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकायलाच हवा. ठाण्याच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही.” घोडबंदरसाठी आतापर्यंत ९५० कोटी रुपये देण्यात आले असून, भविष्यात गरज भासल्यास हा निधी आणखी वाढवला जाईल, असे आश्वासन देत विकासकामांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, “काम सुरू आहे, थांबणार नाही,” असा इशाराही दिला.
महिला मतदारांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले, “महिला माझ्या बहिणी आहेत. त्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं आहे. ‘लाडकी बहिण’सह कोणतीही लोककल्याणकारी योजना बंद होणार नाही.” योजनांबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच महायुतीच्या अधिकृत चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. गाफील राहू नका, दिशाभूल होऊ देऊ नका असे आवाहनही यावेळी करत “कमिटमेंटचं दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे, असे सांगत भाषणाचा समारोप केला.
Marathi e-Batmya