राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

“सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

गुजरात येथील सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ मे रोजी प्रभास पाटण येथे विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा जागर घडवणारा सांस्कृतिक सोहळा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष या विशेष भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते.

यावेळी इलेक्ट्रानिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक भन्साळे यांनीही महादेवाचे दर्शन घेतले. यानंतर मान्यवरांनी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रदर्शनालाही भेट दिली.

सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या ७५ वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वावर प्रकाश टाकला. महमूद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र मंदिराचे अस्तित्व आणि त्यामागील श्रद्धा कधीही नष्ट होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. “भारत हा केवळ भौगोलिक देश नसून तर तो एक चिरंतन संस्कृती आहे. विविध मंदिरे, साधू-संत आणि सनातन परंपरेमुळे भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. ‘सनातन’ म्हणजे ज्याचा अंत नाही आणि सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर यांच्या नृत्याविष्काराने झाली. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. सादर झालेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *