राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या मूळगावी साखराळे येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी लोकं चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी अमेरिकेबद्दलच्या नव्या धोरणावरही जोरदार हल्ला चढवताना म्हणाले की, केंद्र सरकारने आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांसाठी काटेरी वाट निर्माण केली आहे. तर अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी गालिचा अंथरला आहे. सरकारच्या नव्या धोरणानुसार अमेरिकेतील शेतकऱ्यांना त्यांचा माल शुन्य टक्के कराने आपल्या देशात आणता येईल. परंतु भारतातील शेतकऱ्यांना अमेरिकेत जर माल पाठवायचा असेल तर त्याला १८% कर भरावा लागेल. आधी आपला शेतकरी कोणत्याही सुविधेविना, यंत्रणांशिवाय आपल्या मातीत कष्ट करतोय आता त्यात सरकारनेही नवी भर घातली आहे. असंच एकदा फ्रांस देशात झाले होते. अनेक दुग्धजन्य पदार्थ फ्रान्समध्ये कमी दरात आयात व्हायचे. याने फ्रान्सच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यानंतर त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागल्या होत्या असा दाखला देतानाच त्यांनी या विषयावर संसदेत चर्चा व्हायला हवी, केंद्र सरकारने याबाबत देशातील शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे अशी मागणी केली.
बापूंचे अनुयायी मतदानातून उत्तर देतील
मधल्या काळात स्व. राजाराम बापू पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत तसेच त्यांच्या प्रतिमेवर केलेल्या करणीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, बापूंबद्दल सामान्य जनतेच्या मनात प्रचंड आस्था आहे, ते पदोपदी दिसले आहे. जनतेचा बापूंशी प्रचंड संबंध होता. त्यामुळे या चुकीच्या प्रवृत्तीला जनता जागा दाखवणार.
माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, याने जनतेच्या मनावर परिणाम होत नाही
वारंवार भाजपा प्रवेशबाबत उठवल्या जाणाऱ्या वावड्यांबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, अशी वक्तव्ये वारंवार केली गेली पण तसे काही झाले का ? हा सगळा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असतो. जनतेची खात्री पटलेली आहे. त्यामुळे अशा विधानांमुळे त्यांच्या मनावर परिणाम होत नाही.
काही ठिकाणी आम्ही आणि अजित दादांचा पक्ष एकत्र, निकाल चांगलाच लागेल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीची काही ठिकाणी आघाडी आहे. सोलापूर, पुणे अशा अनेक ठिकाणी आम्ही सोबत लढलो आहोत. काही ठिकाणी तर आमचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हांवर उभे आहेत. निकाल चांगलाच लागेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya