उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती, ‘ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ‘ई-निरसन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी ‘ई-निरसन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. तसेच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ‘लाइव्ह ट्रॅकिंग’द्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम होणार असून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून परीक्षा निकालातील विलंब, गुणपत्रिकांमधील त्रुटी तसेच तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे उपस्थित राहण्याची अट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विषयाची गंभीर दखल घेत सातत्याने आढावा बैठका घेतल्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनुभवी शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजनीश कामत यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कामत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष यांच्या समन्वयातून विद्यापीठाने तब्बल ८५ टक्के परीक्षा निकाल यशस्वीपणे जाहीर केले. या कामगिरीसह ‘ई-निरसन’ प्रणालीमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे.

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता – तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट ‘तक्रार क्रमांक’ (Grievance ID) मिळतो. या क्रमांकाच्या सहाय्याने विद्यार्थी ॲपवर आपल्या तक्रारीची सद्यस्थिती कधीही, कुठूनही तपासू शकतो. तक्रार कोणत्या विभागाकडे आहे, कोण हाताळत आहे आणि कधी सोडवली जाईल, या सर्व माहितीचे रियल-टाइम अपडेट मिळतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व ईमेलद्वारे विद्यार्थ्याला सूचना दिली जाते.

About Editor

Check Also

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *