नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींकडून राजमाता अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान हिंदुच्या अस्मितेवर घाला घालणारे हे कसले हिंदुत्ववादी ?

राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र आज अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काशी हे केवळ एक शहर नसून हिंदु समाजासाठी अत्यंत मानाचे व पवित्र अध्यात्मिक केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशीतून तीनवेळा निवडून आले आहेत. काशीच्या विकासाच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेकडो मंदिरे तोडली आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ केला आहे, अहिल्यादेवींची प्रतिमाही तोडली. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदु धर्मात धारणा आहे, हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हिंदु धर्मासाठी पवित्र अशा घाटावर बुलडोझर चालवून मोदी व योगी यांनी हिंदु समाजाचा घोर अपमान केला आहे. तर असे काही घडलेच नाही, जे दाखवले जाते ते एआय (AI) दृश्य आहे असा कांगावा स्वतःला संत म्हणवणारे, भगवे कपडे घालणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. होळकर कुटुंबातील काही लोकांनी काशीला जावून वस्तुस्थिती पाहिली व सरकारला पत्र पाठवले आहे. मी उद्या काशीला जाऊन वस्तुस्थिती पाहणार आहे व मोदी – योगी सरकारचा निषेध करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

‘दावोस’मधील करारांचे पुढे काय होते?

नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त इव्हेंटबाजी आहे. याआधीही लाखो कोटी रुपयांचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत, असा आरोपही यावेळा केला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *