राज्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या राजकीय भेटीने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट कौंटुबिक नव्हती. ठाकरे बंधुंमध्ये आज प्रथमच राजकीय बैठक झाली. यावेळी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत हे ही उपस्थित होते. राज्यात पुढील काही महिन्यात पंचायत समिती, जिल्हा परीषद, नगरपालिका, नगरपरिषद,महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये बैठक झाल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते.
उद्धव-राज ठाकरे बंधूची ही भेट राजकीय नसल्याचे सांगण्यात येत असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री या निवासावरून राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये झालेल्या चर्चेवेळी विधानपरिषद सदस्य अनिल परब आणि खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पालिका निवडणुकींच्या वाटाघाटी बाबत पहिली बैठक पार पडली असल्याचे समजते. महत्वाची बाब म्हणजे येत्या दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे.
या भेटीवर आता राजकीय नेत्यांमधून प्रतिक्रिया येत असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सोबत मनसेबाबत काँग्रेसची चर्चा झाली आहे. परंतु हायकमांड सोबतच्या चर्चेनंतर निर्णय होईल असे स्पष्ट केले.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, समविचारी पक्षांसोबत जाण्यासाठी नेहमीच तयार आहोत असे सांगितले. तर मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, अधिकृतरित्या आमच्यामध्ये बैठका सुरू असल्याचे सांगितले.
सत्ताधारी भाजपाचे राधकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, शिवसेना उबाठा आणि मनसे यांची युती झाली तर महायुतीला फारसा फरक पडणार नसल्याचे सांगत ठाकरे बंधू एकत्र आल्यास काही होणार नाही, तर भाजपाचे प्रविण दरेकर यांनीही निवडणूका जवळ आल्या की अशा गाठीभेटी होत असतात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Marathi e-Batmya