विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ कामकाजात सहभाग नोंदविला. पहिल्या दिवसाचे कामकाजा पहिल्या तास भरातच संपल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, राज्य सरकारला सुचलेल्या शहाणपणामुळे तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. पण जर का त्यांनी तो जीआर रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आमच्या सहित भाजपा, एसंशि, अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी सहभागी होणार होते. त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतोय. मातृभाषेचं प्रेम पक्षाच्या पलिकडे असलं पाहिजे. आता या प्रकरणात एक नविन समिती नेमली आहे. त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा, बुद्धिमत्तेचा आदार राखून सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका. शिक्षणाचा विषय आहे. शिक्षणाच्या विषयात तुम्ही अर्थतज्ञ नेमलेला आहे. समिती कोणतीही असू दे पण सक्ती विषय संपलेला आहे. त्यामुळे कोणाचीही समिती बसवली तरी आता महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती होऊ शकत नाही, हे मराठी माणसाच्या एकजुटीने दाखवून दिलं असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पाच तारखेला मोर्चा किंवा विजयी मेळावा घेण्यासंदर्भात एक-दोन दिवसांत जाहिर होईल. त्याबाबत सगळ्यांशी बोलून निर्णय घेऊ. “आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठीद्रोही पुन्हा डोकं वर काढत आहेत. काल हे डोकं आपण पार चिरडून टाकलंय. त्याचा फणा पुन्हा वर येऊ नये असं वाटत असेल आणि संकट येण्याची वाट बघण्यापेक्षा आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. या एकजूटीचे दर्शन येत्या 5 तारखेला घडवल्याशिवाय राहणार नाही. 5 तारखेला आम्ही विजयोत्सव साजरा करणार आहोत. आंदोलनात पक्षभेद करून सर्व एकत्र उतरले होते, जी एकजूट होती तीच एकजूट विजयोत्सवात दाखवायची आहे. मराठी-अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची, हा या सरकारचा एक कुटिल डाव होता. पण ही फूट पडत नाही, वेगळे होत नाही. त्यामुळे मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द करावा लागला असल्याचेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गिरणी कामगारांची समिती भेटून गेली. त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोतच. त्यांनी मोर्चा काढायचा जाहिर केले कि आम्हीही त्यामध्ये सहभागी होऊ.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग, मंत्र्यांचा घोटाळा, शेतकऱ्यांचा विषयही प्रलंबित आहे, कॉलेज प्रवेशाचाही घोळ आहे. मुलांची यादी जाहिर झाली. “मला उत्सुकता आहे की कमळी कोणत्या भाषेतून शिकली असेल. हे म्हणतात कमळीला १०० पैकी १०० मार्क मिळाले. कमळीला मार्क मिळाले शंभर कमळी आमची एक नंबर. कमळी आमची. कमळी कोणत्या शाळेत शिकली, तिच्यावर भाषेची सक्ती होती काय, तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कामध्ये ईव्हीएम वापरलं होतं का? असा टोलाही यावेळी लगावत कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत, त्यांना मला बघायचे आहे असा गर्भित इशाराही यावेळी दिला.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र विधिमंडळ, मुंबई येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. pic.twitter.com/QoY1mliava
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 30, 2025
Marathi e-Batmya