मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
खासदार वर्षा गायकवाड यांनी आज वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, वांद्रे पश्चिम येथे के. बी. भाभा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत सध्या ४३६ खाटा आहेत, या इमारतीत कॅथलॅब, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डीयाक व ब्लड बँक या सुविधा पुरवल्याशिवाय रुग्णालयाचे उद्घाटन करणार नाही अशी ग्वाही महापालिकने दिली होती. परंतु आजपर्यंत या सुविधा सुरु केलेल्या नाहीत. या रुग्णालयात विविध विभागात १०० डॉक्टरांची आवश्यकता आहे व पुरेसे डॉक्टर नाहीत. रुग्णालयात वेळेवर औषधे मिळत नाहीत, मधुमेह, ब्लड प्रेशरच्या औषधांचा तुडवडा आहे. २०२४-२५ मध्ये औषधांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली होती, ती यावर्षी कमी करून ६ कोटी रुपये केली आहे. १४ महिन्यांपासून औषधांच्या निविदा काढलेल्याच नाहीत. अतिदक्षता विभागात आयसीयु, ट्रॉमा आयसीयु, लहान मुलांचे आयसीयु विभाग आहेत परंतु डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णालयाच्या बेडच्या तुलनेत अतिदक्षता विभागातील बेड्सची संख्या फारच कमी आहे. २ डी युको मशिन उपलब्ध नाही, पॅथालॉजी सुविधाही बंद आहे. सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्यांसाठी या उपनगरी रुग्णालयांमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा तपासण्यांची गरज भासल्यास रुग्णांना मोठा खर्च करून बाहेर जावे लागते असे सांगितले.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, बीएमसीतील राज्य सरकार नियुक्त प्रशासक राज मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. ७ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा का मिळत नाहीत, हे पैसे कोणाच्या खिशात जातात याचे उत्तर राज्य सरकार व बीएमसी प्रशासकाने द्यावे असा सवालही यावेळी केला.
मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?
खासदार वर्षा गायकवाड यांनी आज मिठी नदीचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बीएमसी व राज्य सरकाराच्य कामावर तोफ डागताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केले आहे की, यावर्षी मिठी नदीची सफाई केवळ ५५% पूर्ण झाली आहे. संपूर्ण मुंबईत नाल्यांची सफाई पाहिली तर ती, केवळ ६८% पूर्ण झाली आहे. याचे विपरीत परिणाम आपल्याला पहिल्याच पावसात स्पष्टपणे दिसून आले आहेत.
पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी मिठी नदी सफाईतील भ्रष्टाचाराबाबत कारवाई करत असल्याचे ढोल या सरकाराने बडवले, पण आजची परिस्थिती काय सांगते? आज काँग्रेसच्या सहकाऱ्यांसोबत मिठी नदी परिसराला भेट दिली असता अजूनही नदीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून आला. महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने उत्तर द्यावं की त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना पूर परिस्थितीची समस्या अजून किती काळ सहन करावी लागणार आहे? आणि या बेजबाबदारपणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई कधी होणार? असा सवालही यावेळी केला.
Marathi e-Batmya