मुंबईः विशेष प्रतिनिधी
हाता तोंडाशी आलेला घास असतानाही राज्यातील सत्ता हातची सत्ता गेल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रकाश महेता यांच्याकडून पक्षातंर्गत काराभारावर टीकेचे सत्र केले. त्यामुळे या तीन नेत्यांची खडखद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात असा प्रश्न भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारची सारी सुत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. परंतु कालांतराने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील प्रतिस्पर्धी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मागे भूखंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम प्रकरणाचे शुल्ककाष्ठ लावत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. यासंदर्भातील चौकशी अहवालही त्यांनी सरकारचा कालावधी पूर्ण होत आला तरी जाहीर केला नसल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.
त्यानंतर विधानसभा निवडणूकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढणारे त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष मदत करत पंकजा मुंडे यांचा पराभव केल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपातच रंगली आहे. त्यातच माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे वगळता प्रकाश महेता आणि एकनाथ खडसे हे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. मात्र निवडणूकीत मुंडे गटाबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटाचे तावडे, बावनकुळे यांनाही साधे तिकिटही देवू दिले नाही. त्यामुळे या सर्वच नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरोधातील रोष वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात या नेत्यांनी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पुरावे सादर करण्याची इच्छा दाखविली. मात्र केंद्रीय नेत्यांनी या चारही नेत्यांना भेटीसाठी वेळच दिली नाही. त्यामुळे राज्यातील फडणवीस यांच्याकडे असलेले पक्षाचे नेतृत्व काढून घेण्यासाठी या चारही नेते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाबाजूला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच केंद्रातील नेत्यांना आपले महत्व दाखवून देण्यासाठी या नेत्यांकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya