राज्यात इथेनॉलशी संबंधित तांदूळ घोटाळ्याचे वृत्त समोर आल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी आरोप केला की, भाजपाच्या राजवटीत मध्य प्रदेश “भ्रष्टाचार आणि लुटीचे केंद्र” बनले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विषयावरील मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरोप केला की, भाजपाच्या राजवटीत सार्वजनिक जीवनातील उत्तरदायित्वाला धक्का पोहोचला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांतील वृत्तांचा हवाला दिला, ज्यात असा आरोप करण्यात आला आहे की, इथेनॉल उत्पादनासाठी असलेला तांदूळ मध्य प्रदेशातील सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये परत वळवला जात असल्याचा आरोप केला.
वृत्तानुसार, राज्य सरकारने एका संशयित कोट्यवधी रुपयांच्या फोर्टिफाइड-तांदूळ वळवण्याच्या रॅकेटची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या रॅकेटमध्ये, मान्यताप्राप्त इथेनॉल प्रकल्पांना पुरवलेले अनुदानित धान्य खासगी गिरणी मालकांना विकले जात होते आणि नंतर ते सरकारी गोदामांमध्ये परत जमा केले जात होते.
अहवालांचा संदर्भ देत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “आता इथेनॉलच्या नावाखाली १,२०० कोटी रुपयांचा तांदूळ घोटाळा उघडकीस आला आहे. जो तांदूळ कुपोषित मुले, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींच्या पोषणासाठी वापरला जाणार होता, तोच नफेखोरीच्या खेळात वळवण्यात आला आहे.” असाही दावा केला की, तांदूळ गिरणी मालक, इथेनॉल माफिया आणि भाजपा सरकारच्या संरक्षणाखाली ५ लाख मेट्रिक टन तांदूळ या “भ्रष्ट खेळाचा” भाग बनला असल्याचा आरोप केला.
सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “भाजपा आणि सरकारी यंत्रणेच्या संगनमताने जनतेच्या हक्काचे धान्य लुटले जात आहे.”
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढे असा दावा केला की, यापूर्वी एक मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला होता आणि उज्जैनमधील ज्या भागांमध्ये सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि महामार्ग कॉरिडॉर प्रस्तावित होते, तेथील जमीन विस्ताराशी संबंधित आरोपांचा उल्लेख केला.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, या घडामोडींमुळे मुख्यमंत्र्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर नातेवाईकांच्या नावावर जमीन खरेदी केल्याप्रकरणी अलीकडेच झालेल्या आरोपांचा संदर्भ दिला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरोप केला की, राज्यात विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार पसरला आहे आणि व्यापम घोटाळ्याच्या काळापासून कागदपत्र फुटीची प्रकरणे व इतर गैरव्यवहारांच्या आरोपांमधून ‘लूटमारी’चा हा प्रकार सुरूच आहे.
पुढे बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपाने मध्य प्रदेशला ‘भ्रष्टाचाराचा नमुना’ बनवले आहे आणि पुढे म्हणाले की, “मोदीजी केवळ निःशब्दपणे बसून आहेत” आणि “मोदी-शाह जोडीने सत्तेच्या गर्वाखाली सार्वजनिक जीवनातील उत्तरदायित्वाची संकल्पनाच पायदळी तुडवली असल्याची टीकाही केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची ही वक्तव्ये अशा वेळी आली आहेत, जेव्हा मध्य प्रदेशात इथेनॉलशी संबंधित तांदळाच्या कथित गैरवापराच्या प्रकरणाने लक्ष वेधून घेतले आहे. खर्गे यांनी या मुद्द्याचा वापर करून राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारवर भ्रष्टाचार आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला आहे.
Marathi e-Batmya