मुंबईः विशेष प्रतिनिधी
सततच्या अवकाळी पावसामुळे आणि पर्यावरणातील बदलामुळे यंदा थंडीचा भलताच गारठा मुंबईकरांना जाणवायला लागला आहे. दिवस उजडून माथ्यावर आलातरी वाजणारी थंडी कमी होत नसल्याने मुंबईकरांनी दिवसाही स्वेटर, जॅकेट घालण्यास सुरूवात केल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यातच १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक, जळगांव मध्ये थंडीची लाट येणार असल्याचे भाकित हवामान खात्याने जाहीर केले आहे.
आजच्या थंडीच्या गारव्याने, कल्याण-डोंबिवली, पनवेल, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, पवई आदी भागात तापमान १० अंश सेल्सियल्सवर आल्याचे दिसून आले. मुंबई आणि उपनगरातील इतर भागात १५ ते २० अंश सेल्सियस पर्यंत उतरल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी घरात चादर, ब्लँकेट, स्वेटर आदी परिधान करून बसल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
याशिवाय सीएसटी, नरिमन पाँईट, कुलाबा, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडियाचा परिसरातही येणाऱ्या पर्यटकांनीही मुंबईतल्या गारठ्याने चांगलेच गोठवून टाकल्याचे पाह्यला मिळत होते. वास्तविक पाहता समुद्र किनाऱ्या लगतच्या परिसरात थंडी फारशी जाणवत नाही. मात्र यंदा मुंबईतला सबंध परिसर यास अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे. आज शुक्रवार आणि शनिवारी जळगांव आणि नाशिक मध्ये थंडीच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे.

Marathi e-Batmya