मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे खाती नाही. तसेच निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत असलेली नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नेत्यांचे म्हणणे ऐकत यासंबधीचा निर्णय नंतर कळविणार असल्याचे सांगत कोणतेही ठोस आश्वासन देण्याचे टाळल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
काँग्रेसने सरकारधील स्थानाबद्दल मागील काही दिवसांपासून नाराजी व्यक्त करत होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना दुपारी १.३० वाजताची वेळ दिली. त्यानुसार काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली.
या चर्चेत प्रामुख्याने निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसला स्थान मिळावे, काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासह काही महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व ऐकून घेत यासंदर्भात नंतर निर्णय कळविणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आम्ही आमचे प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे लवकरच त्याअनुषंगाने आपला निर्णय कळवतील असे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya