मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे अशक्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायची असेल त्यांची परिक्षा घ्यावी असे स्पष्ट आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा न देता अभ्यासक्रमाचे पदवी (डिग्री) प्रमाणपत्र हवे असेल अशा विद्यार्थ्यांकडून लेखी लिहून घेवून त्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतची व्यवस्था करावी असे निर्देश विभागाकडून सर्व विद्यापीठांना देण्यात आले.
त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहेत अशा विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याबाबत किंवा राज्य सरकारशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे आदेशही विद्यापीठांना बजाविण्यात आले.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन शास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शाररीक शास्त्र, अध्यापन शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार नसल्याचेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.




Marathi e-Batmya