मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात सत्तांतर होवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाला. मात्र या वर्षभरात सत्तेविना राहणे मूळ भाजपा आमदारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपावासी झालेल्यांना जीवावर आले असून काही तरी करा अन्यथा आम्ही पक्षांतर करू असा इशारा बाहेर पडू इच्छीणाऱ्या ४० आमदारांनी दिला असल्याने त्या ४० जणांच्या नावांची यादी मोटाभाय ला पाठवून दिल्याची माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मागील ५ वर्षाच्या कालावधीत राज्यात सत्ता असतानाही एकाही कार्यकर्त्याला शासकिय कमिट्याचा लाभ मिळाला नाही. उलट सत्तेसाठी विविध पक्षातून आलेल्यांनाच त्याचा लाभ मिळाला. त्याचबरोबर पुन्हा सत्ता आल्यानंतर बाहेरून आलेल्यांनाही लाभाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता सत्तेतच नसल्याने बाहेरून आलेल्यांना काय देणार असा सवाल उपस्थित करत त्यापेक्षा सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी होणे चांगले असे मत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेल्या मात्र भाजपात पदाधिकारी असलेल्या नेत्याने व्यक्त केले.
याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या अन्यायकारक कारभारामुळे अन्यायग्रस्त झालेल्या अनेक भाजपातील मूळ आमदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. आता सत्ता गेल्यानंतरही या माजी निष्ठावानांवरील अन्याय सुरुच राहीला आहे. त्यामुळे या निष्ठावंतानीही भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी चालविली असल्याची माहिती एका नाराज माजी आमदाराने दिली.
एकाचवेळी आजी-माजी ४० आमदारांनी भाजपाला रामराम केल्यास राज्यात आणि राष्ट्रीयस्तरावर पक्षाची नाचक्की होईल. हि वेळ येवू नये साठी राज्यातल्या भाजपा नेत्यांनी पुन्हा सरकार पाडा पाडीच्या कामाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र या बाहेर पडणाऱ्यांची यादी मोटाभायला पाठवून दिली आहे. त्यावर अद्याप मोटाभायकडून कोणतीही सूचना आली नाही. मात्र ती यादी पाठवून दिल्याने सध्या हे ४० जण तात्पुरते शांत असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya