मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या एकूण ७ मतदारसंघातील ८ जागा आमदारांची मुदत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपत आहे. त्यामुळे या ८ जागांसाठी निवडणूक घेण्याऐवजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच मतदारसंघातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. यातून सोलापूर आणि अहमदनगर स्थानिक मतदारसंघातून निवडूण येणाऱ्या जागांसाठी नंतर निवडणूक घेण्यात येणार आहे.
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांमधून शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे अशोक भाई जगताप, कोल्हापूरातून सतेज बंटी पाटील, धुळे-नंदूरबार मधून अमरीश पटेल, अकोला-वाशिम-बुलढाणा येथून गोपीकिशन बजोरीया, नागपूरमधून गिरीश व्यास, सोलापूरातून प्रशांत परिचारक, अहमदनगरमधून अरूणकाका जगताप यांची विधान परिषदेवरील सदस्यत्वाची मुदत एक जानेवारीला संपत आहे.
मात्र निवडणूक आयोग विरूध्द शिवाजी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असतील तरच त्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक घ्यावी असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यतील स्थानिक स्वराज्य संस्था आता पूर्णतः कार्यरत नाहीत. त्यामुळे तेथील निवडणूका या पुढे ढकलण्यात आल्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यापैकी मुंबईतील रामदास कदम, अशोक जगताप, कोल्हापूरातून सतेज बंटी पाटील, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, अकोला-वाशिम-बुलढाणा येथील गोपीकिशन बजौरिया, नागपूरमधील गिरीश व्यास यांच्या होणाऱ्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी निवडणूकीची अधिसूचना जारी होईल तर २३ नोव्हेंबर अखेरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. १० डिसेंबरला मतदान होईल तर १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होवून निकाल जाहिर कऱण्यात येणार आहे.


Marathi e-Batmya