एकनाथ शिंदे यांनी ‘तो’ किस्सा सांगताच फडणवीसांनी लावला कपाळाला हात भेट कधी व्हायची याचा केला गौप्यस्फोट

विधानसभा अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर ठरावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी सांगितल्याप्रमाणे या बंडामागील अनेक कारणे आणि राजकिय प्रवासातील अनेक किस्से सांगत सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडवून दिला.

मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो. एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका, अशी म्हण्याची वेळ फडणवीसांवर आली. एकनाथ शिंदेच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र, फटकेबाजी करतानाही त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचंड हसवले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री भेट कशी व्हायची? याचा खुलासा शिंदेंनी केला. शिंदेंच्या या खुलाशानंतर फडणवीसांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे ११५ आणि आमचे ५० असे मिळून १६५ झाले. अजितदादा तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे १६५ नाही, तर आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेतील बंडाबद्दल बोलताना तुफान फटकेबाजी केली. बंडखोर आमदारांना गुजरातमध्ये कसे नेण्यात आले? यावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उद्देशून बाकीचं खासगीत सांगेन असे मिश्किल भाष्य केले. तसेच पुढे त्यांनी शिवसेनेने बेळगावमध्ये केलेल्या आंदोलनाचा खास किस्सा सांगितला.

छगन भुजबळ बेळगावला वेश बदलून गेले होते. तिकडे गेल्यावर भुजबळ यांच्यासोबत असलेल्या लोकांनी कर्नाटकच्या पोलिसांना मारले. त्यानंतर महाराष्ट्रातून आमची १०० लोकांची तुकडी गेली. तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्या लोकांनी खूप मारलं. नंतर आम्हाला बेल्लारीच्या तुरुंगात टाकण्यात आलं. आम्ही १०० लोक ४० दिवसांसाठी तुरुंगात होतो. आम्ही ज्या तुरुंगात गेलो होतो, तिथे रविवारी अंडी खायला मिळत. मात्र आम्ही गेल्यावर तेही बंद करण्यात आलं. चाळीस दिवस आमचे खूप हाल झाले. पण आम्ही घाबरलो नाही. डगमगलो नाही. तेव्हा आनंद दिघे यांनी एक-एक लाख रुपये जमवून १०० लोकांना जामीन मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी लोकशाहीत आकडा बोलतो. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आता सर्व विसरुन राज्याच्या विकासासाठी काम करुया. राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करायचे आहे. त्यासाठी आम्ही काम करु. तसेच लवकरच पेट्रोलवरील व्हॅट कमी करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *