आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्या रक्तातच शिवसेना नव्हती…कपाळी गद्दारीचा शिक्का बंडखोरांवर आदित्य ठाकरे यांनी केली टीका

आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांशी संवाद साधला.

४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बंडखोर आमदारांकडून आम्ही उध्दव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केला अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत. मात्र, मुळात हे बंडच नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नाही तर माणूसकीशी केलेली गद्दारी असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक पुन्हा लढवा, असे आवाहनही त्यांनी बंडखोर आमदारांना केले.

उद्धव ठाकरें जेव्हा करोनामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यावेळेस त्यांच्यावर दोन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या बंडखोरीची योजना बनवली जात होती. एवढचं नाही तर पुढचा मुख्यमंत्री कोणाला बनवता येईल याबाबतही चर्चा सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे यांना हलचाल कऱण्यातही त्रास होतोय हे माहिती असूनही गद्दारी करण्याचं धाडस बंडखोर आमदारांनी केली असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत असून शिवसेनेच्या गडातील पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे गुरुवारी सकाळी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. निष्ठा यात्रेनिमित्ताने ते भिवंडी येथे आल्यानंतर ते बोलत होते. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आंनदनगर नाक्यावर त्यांच्या स्वागतानिमित्ताने शिववसैनिकांकडून शक्ती प्रदर्शन केले.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील सेनेच्या गडाला सुरुंग लागले आहे. शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत असून यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

तर, शिवसेनेने अद्याप जिल्हा प्रमुख जाहीर केलेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा गुरुवारचा ठाणे जिल्ह्याचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. आदित्य ठाकरे यांचे धर्मवीरांच्या ठाणे नगरीत सकाळी आगमन होणार असून तेथे त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक जमले होते.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *