नाना पटोले यांची मागणी, इर्शाळवाडी घटनेत ५ लाखांची मदत अत्यल्प; गावांचे पुनर्वसन करा सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इर्शाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इर्शाळवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक सर्व गावांचे पुनर्वसन करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, इर्शाळवाडी सारखी परिस्थिती कोकणात अनेक ठिकाणी आहे. पुनर्वसन करताना या सर्व भागाचाच विचार करावा लागणार आहे. पुनर्वसन करताना चांगल्या जागेत झाले पाहिजे. माधव गाडगीळ समितीच्या आधारावर पुनर्वसनाची व्यवस्था करावी. निरपराध लोकांचा जीव जाणार नाही यासाठी अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या या गावात अजून रस्ताही झालेला नाही. मी स्वतः जाऊन या लोकांशी संवाद साधला. आताही या लोकांचे अश्रू थांबलेले नाहीत.

सरन्यायाधीशांवर टीका करण्याची हिम्मत..

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, मणिपूर तीन महिन्यापासून जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, फ्रान्सच्या दौऱ्यात व्यस्त होते तेथून देशात आले तर पक्षाचा प्रचार करण्यात मग्न राहिले. मणिपूरवर एक शब्दही त्यांनी काढला नाही. ७८ दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडत, ‘कोणालाही सोडणार नाही’ असे विधान केले. एवढे बोलण्यास त्यांना तीन महिने लागले. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी अन्यथा न्यायालय कारवाई करेल असे म्हटले होते, त्यांची चिंता स्वाभाविकच आहे. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत न्यायालयाच सुनावणारे ट्वीट केले आहे. सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी राज्यपाल व सरन्यायाधीश यांना अवगत करु असेही म्हणाले.

भाजपाच्या राज्यात महिलेची विवस्त्र धिंड काढून बलात्कार केला ही हैवानियत आहे. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देशाला कलंक लावण्याचे काम केले आहे. भारताच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे हे कृत निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे, असेही पटोले म्हणाले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *