लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील अर्थात सातव्या टप्प्यातील मतदान संपण्यपूर्वीच नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई, आम आदमीचे पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, माकपचे नेते सीताराम येचुरी, डिमकेचे नेते टी बालू, आरजेडीचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते.
इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर सर्व नेत्यांनी मिळून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी इंडिया आघाडीच्यावतीने मल्लिकार्जून खर्गे यांनी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आज इंडिया आघाडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला आघाडीतील सर्व सदस्य राजकिय पक्ष सहभागी झाले होते. आज झालेल्या बैठकीत मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत आणि मतमोजणीच्या दिवशी घ्यावयाच्या काळजीबाबत कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारच्या सूचना द्यायच्या याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच सध्याचे वातावरण बघता गडबडी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक राज्यातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून योग्य ती काळजी घेण्याविषयी सूचना देण्यात आली आहे.
पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, तसेच आतापर्यंत झालेल्या मतदानातील जनतेचा सर्व्हेची माहिती आम्ही घेतली. यावेळी देशभरात लोकसभा निवडणूकीत कमीत कमी २९५ जागा मिळणार असल्याचा आमचा जनतेचा सर्व्हे आहे. तसे तर सर्व्हे अनेक होतात. तसा सरकारी सर्व्हेही होतो. पण आमचा सर्व्हे सरकारी नाही तर जनतेचा सर्व्हे आहे. त्यामुळे किमान २९५ जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत या जागांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण या संख्येत घट होणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, मतमोजणीच्या दिवशी काही गडबडी होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेणार आहोत. तसेच मतमोजणीच्या दिवशी कोणते आदेश दिले, द्यावयाचे राहिले आहेत, तसेच भाजपा आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानेही आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान, मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आमचे प्रसार माध्यमातील काही मित्र ज्यांना जी काही आकडेवारी मिळते. त्याची सत्य परिस्थिती कथन करत नाहीत. मात्र त्यात आणखी काही गोष्टींची सरमिसळ घालून ती जास्तीची दाखवितात. मात्र आम्हाला २९५ च्या जागांची मिळालेली आकडेवारीही जनतेने केलेल्या सर्व्हेची असल्याचे यावेळी सांगितले.
https://x.com/INCIndia/status/1796868703046475778