काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्रीपासून पुण्यात कोसळलेल्या पावसामुळे पुणे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली. एकाबाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्याबाजूला खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सिंहगडरोडवरील एकता नगर आणि अन्य भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झाले. एकता नगरमध्ये तर छातीपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाह्यला मिळाले. यापार्श्वभूमीवर दुपारनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करत पूरग्रस्तांना दिलासा दिला.
या भागातील नागरिकांनी नदी काठच्या भागात वाढलेल्या पाण्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी आहे त्या परिस्थितीतून बचावासाठी घरातून बाहेर पडले. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय या भागात असलेल्या मोठमोठ्या इमारतीतही पाणी घुसले, बर हे पाणी फक्त इमारतीच्या बेसमेंटपर्यंतच पोहोचले नव्हते तर चार मजल्यापर्यंत पाणी आत घुसले होते. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी टेरेसकडील वरच्या मजल्यावर आसरा घेतला.
दुपारनंतर खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर आणि पावसाने काही काळ उघडीप दिल्यानंतर अजित पवार यांनी सिंहगड रोड वरील एकता नगर आणि परिसराला भेट दिली.
विशेष म्हणजे या भागात पाणी जमा व्हायला लागल्यानंतर स्थानिकांनी पुणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले. मात्र पुणे महापालिकेने कोणतीच मदत पाठविली नसल्याचा आरोपही स्थानिक रहिवांशानी केला.
यावेळी नागरिकांनी अजित पवार यांच्यावर एकच प्रश्नांची सरबती केली. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, काही गोष्टींमध्ये चूक झाली असण्याची शक्यता आहे. मात्र खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील पाणी सोडण्यात आले होते. या पुरपरिस्थितीत ज्या ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीची भरपाई राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका असे दोघे मिळून मदत करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी काही नागरिकांनी धरणातून पाणी सोडून देण्यापूर्वी त्याची माहिती प्रशासनाने नागरिकांना दिली नाही. अन्यथा आम्ही सुरक्षित ठिकाणी गेलो असतो पण धरणाचे पाणी सोडणार असल्याची कोणतीही माहिती प्रशासनाने आम्हाला दिली नव्हती असे सांगितले.
त्यावर अजित पवार यांनी सांगितले की, आता संध्याकाळी ६ वाजता पुन्हा धरणातील पाणी सोडणार असून त्यापूर्वी तुम्ही सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या असे सांगितले.
या भेटीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पावसाच्या पाण्यामुळे किंवा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली नसून चुकीच्या पध्दतीने बांधकाम केल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले.