विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा
वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक १६४ मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.
या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन बाली यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.
Marathi e-Batmya