शहिदांच्या पार्थिवाला अग्नी मिळण्याआधीच निवडणूक प्रचाराला सुरुवात

यवतमाळ मधील सभेने पंतप्रधान मोदी यांच्याकडून जनतेला आवाहन

मुंबईः प्रतिनिधी

जम्मू व काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या ४४ जवानांच्या पार्थिवाला आज दुपार पर्यंत अग्नीही मिळालाही नाही. तोच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, आदीवासी यांच्यासह सर्वांना पुन्हा भाजपलाच आगामी निवडणूकीत विजयी करण्याचे आवाहन करत निवडणूक प्रचारास सुरुवात केली.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी.विद्यासागर, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते निधींतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन, कळंब- राळेगाव- वडनेर-वडकी महामार्गाचे लोकार्पण, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील एकलव्य आदर्श निवासी शाळेचे उद्घाटन, अजनी (नागपूर)-पुणे हमसफर रेल्वेला व्हीडीओच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखविण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आणि लाभार्थ्यांना घरकुल वितरण आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, धनादेश वितरीत करण्यात आले. चंद्रपूर येथील हिमोग्लोबीन तपासणी केंद्राचे ई-उद्घाटन करण्यात आले.
या सभेत शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली वार्षिक ६००० रूपये देण्याची योजना ही फक्त एक वर्षासाठी नसल्याचे सांगत पुढील अनेक वर्षे सुरु ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी भटकंती करणारा भटका समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या कल्याणासाठी मंडळाची स्थापना करण्यात येणार असून श्रमयोगी मानधन योजनेतून वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर ३ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली. याशिवाय आदिवासींच्या सामाजिक सुरक्षेसाठी व त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ३० टक्के तरतूद करण्यात आलेली असून जल-जंगल-खेळ यातून आदिवासींच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशाला खेळाच्या क्षेत्रात महासत्ता बनविण्यासाठी देशातील आदिवासी बहुल १५० जिल्ह्यात खेळाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या सभेच्या सुरुवातीला विरोधकांना टीकेची संधी नको म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वहात पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे जाहीर करत भारतीय सैन्याला पुरेशी मोकळीक दिल्याचे सांगितले.
तसेच गत निवडणूकीत जसे भाजपला भरघोस मतांनी निवडूण दिले तसेच याही वेळी भाजपला भरघोस मतांनी निवडूण द्यावे असे आवाहन करत स्थानिक जनतेची मने जिंकण्यासाठी कोलामी, बंजारा आणि मराठी भाषेतून संवाद साधला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *