जिथे जातपात, वर्णभेद, अंधश्रध्दा, श्रध्देला अजिबात स्थान नाही, तिथे फक्त न्यायदानाचे काम सर्वोच्च मानून न्याय प्रक्रिया पार पाडली जाते. अशा ऐतिहासिक उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या आवाराबाहेर कोणीतरी काळी जादू केल्याचा प्रकार पहायला मिळाले. ही बातमी सर्वत्र परसल्यानंतर तेथील काळ्या जादूचे साहित्य उचलण्यात आले. परंतु, राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असताना उच्च न्यायालयाबाहेर काळ्या जादूचा प्रकार आढळून आल्याने सगळ्यांच्या भूवया उंचवल्या आहेत.
सोमवारी सकाळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना काळ्या जादूचे साहित्य दिसून आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या बोर्डाखालीच नारळ, लिंबू, काळी बाहुली, हळद, कुंकू, गुलाल आढळून आले. त्यासंदर्भात चौकशी केली असता, दोन-एक दिवसांपासून हे काळ्या जादूचे साहित्य उच्च न्यायालयाच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तसेच हे काळ्या जादूचे साहित्य उच्च न्यायालयाच्या चार वेगवेगळ्या दिशांमध्ये म्हणजे उच्च न्यायालयाच्या चार गेटच्या बाहेर ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. हा प्रकार कोणी केला? कधी केला? याबाबत कोणालाच काही माहिती नाही. विशेष म्हणजे मांडून ठेवलेले काळ्या जादूचे साहित्य उचलण्यास कोणी तयार नव्हते. पालिका कर्मचारी, उच्च न्यायालयातील काही स्वच्छता विभागाचे कर्माचारी तेथे उपस्थित होते, परंतु, कोणीही ते साहित्य उचण्यास तयार नव्हते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन कऱणाऱ्या अनिससारख्या संस्था जादूटोणा, काळी जादू इत्यादीला विरोध करीत असताना हा सर्व प्रकार अंधश्रध्देचा भाग असल्याचे सांगत असताना सर्वसामान्य मात्र अद्यापही अंधश्रद्धा आहारी गेल्याचे पहायला मिळत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते आणि विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकरांच्या अथक प्रयत्नानंतर राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. डॉ. दाभोलकरांनी जो कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हयातभर प्रयत्न केले, तो त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ असे या कायद्याचं पूर्ण नाव आहे. २६ ऑगस्ट २०१३ रोजी हा कायदा अंमलात आला. २६ जानेवारी २०१६ रोजीया कायद्यात सुधारणा करण्यात आली.
Marathi e-Batmya