मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्च रोजी लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात फायलींच्या निपटाऱ्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. यामध्ये विशेषत वित्त विभाग, नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.
निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील विकास कामांच्या अनुषगांने कोणताच नव्याने निर्णय घेता येत नाही. तसेच निधींचे वाटपही करता येत नाही. त्यामुळे विकास कामे रखडण्याची शक्यता निर्माण होते. याकारणास्तव निधी वाटप, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या फाईली तातडीने पूर्ण करून त्या पुढे पाठविण्यासाठी जवळपास सर्वच विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.
८ मार्च अर्थात उद्या दुपारनंतर निवडणूकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेणे शक्य नाही. त्यादृष्टीने उद्याच ८ मार्च रोजी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेवून जनतेला भुरळ घालणारे ५० निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सचिव कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
याचबरोबर या महिनाभरात घेण्यात आलेल्या संबध मंत्रिमंडळ निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या फायलींची तातडीने पूर्तता करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya