बाळासाहेब थोरात यांचाही लाव रे तो व्हिडीओः २५००० नागरिकांचा भव्य विराट मोर्चा अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात कडाडले

राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे २५००० नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले.

स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा संपन्न झाला. यामध्ये तालुक्यातील २५००० नागरिकांनी सहभाग घेऊन यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा केला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह मध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे .गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. सप्ताहांचे आयोजित केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरल्याचे सांगितले.

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का? असा सवाल करत भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली असल्याचा आरोपही यावेळी केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की, तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे .आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत.

यावेळी विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

मोर्चाला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला खडसावले. शांती मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातील गावागावातून अनेक कार्यकर्ते गाड्या भरून संगमनेर शहरांमध्ये येत होते. मात्र या मोर्चामध्ये लोक येऊ नये याकरता पोलिसांनी चारही दिशांनी गाड्या अडवल्या ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का असा सवाल करताना हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला.

बाळासाहेब थोरात यांचा लावरे तो व्हिडिओ 

घुलेवाडी येथील घटनाही नियोजित षडयंत्र होते. यासाठी मागील दहा दिवसांपूर्वीच प्लॅनिंग सुरू असल्याचे विविध व्हिडिओ व पुरावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तमाम जनतेला दाखवले असून प्रत्येक आरोपाचे खंडन करत हे षडयंत्र कसे रचले गेले संग्राम भंडारे कसा खोटा बोलत आहे. त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही.  भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचे हे षडयंत्र दाखवताना लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी सर्व पुरावे सादर केले यावेळी तमाम जनतेने भंडारे याचा तीव्र निषेध केला.

About Editor

Check Also

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *