आज १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
या अपघातात ओम्नी कारमधील ११ निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता ५+१ असताना त्यामध्ये ११ प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, ही नम्र विनंती.
Marathi e-Batmya