दत्तात्रय भरणे यांची माहिती, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबीजच्या आकृतीबंधास मंजुरी महाबीजच्या एकूण ७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मान्यता

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे. हा आकृतीबंध अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र, कृषी विभागाने याबाबत आज शासन निर्णय जारी केला असून, एकूण ७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शासन निर्णयानुसार महाबीजच्या विद्यमान आकृतीबंधामध्ये सुधारणा करून ६५० नियमित पदे, १०० अधिसंख्य पदे आणि ६३ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास, प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम होण्यास तसेच बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.”

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, यापूर्वी, ३० ऑक्टोबर २०१४ रोजी मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात एकूण ७३७ पदे होती. नव्या सुधारित आकृतीबंधात संस्थेच्या सध्याच्या गरजा, तांत्रिक बदल आणि कार्यपद्धतीतील सुधारणा लक्षात घेऊन पदरचनेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. अधिसंख्य पदे रिक्त झाल्यानंतर ती पुन्हा भरण्यात येणार नसून भविष्यात मंजूर नियमित पदांची संख्या ५६० इतकीच राहणार आहे.

शेवटी दत्तात्रय भरणे म्हणाले की, सुधारित आकृतीबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहरेकरी, लघुलेखक निम्न श्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत नुकसान भरपाई राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद अंतर्गत २०९ कोटींचे वाटप करणार

कोकण विभागातील अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *