मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मुग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून त्याचे श्रेय केंद्र सरकारच्या ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान काढण्यात आलेल्या आदेशाला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला किमान २७५० ते २९९० तर उडीदला ३५०१ ते ५६०० इतका मिळण्यास सुरुवात झाली असून खाजगी कंपन्या ३१५० हून अधिक रकमेने खरेदी करत असल्याचा दावा राज्याच्या कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला.
मंत्रालयातील वार्ताहर कक्षात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारने आयात शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून निर्यात शुल्क कमी करण्यात आलेले आहे. युपीए सरकारच्या काळात क्रुड पामतेलावर १५ टक्के आय़ात शुल्क होते. त्यात दुपटीने वाढ करत आता ३० टक्के करण्यात आला आहे. तर पूर्वी रिफाइन पामतेलावर असलेला २५ टक्के आयात शुल्कात वाढ करत तो ४० टक्के, सुर्यफूल तेलाच्या आयात शुल्कातही १२.५ टक्केने वाढ यासह क्रुड सोयाबीन तेल, रिफाइन सोयाबीन तेल, क्रुड आणि रिफाइन रेपसीड मोहरी कनोला तेलांवर ही १२.५ ते १५ टक्के आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्वच तेल महाग बनली असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना वाढीव स्वरूपात दर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर राज्यात चना आणि पिवळा वटाणा याच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्याच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेल्या कडधान्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून एकट्या सोयाबीनच्या दरात जानेवारी महिन्यात ३२०० रूपयांपर्यंत वाढ होणार असल्याचा दावाही पाशा पटेल यांनी यावेळी केला.
Check Also
शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची चौथी फेरी चंदीगढ मध्ये
एकाबाजूला देशातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी या मागणीवरून केंद्रातील …