मुंबई: प्रतिनिधी
जीवनविद्या मिशनचे तन-मन-धन यासंदर्भातील शिबिर अत्यंत अभ्यासपूर्ण, माहिती प्रचूर, आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणांना साक्षात जीवंत करणारे असून अशी शिबिरे विदर्भ आणि मराठवाड्यात आयोजित करण्यात आली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चित पणे थांबतील, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी व्यक्त केले. जीवन विद्या मिशन बोरीवली शाखेच्या विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील श्यामकुंज बँक्वेट हॉलमध्ये ‘स्वानंद योग’ हे फौंडेशन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. जनार्दन घुगे यांनी ‘तन’, वैशाली राणे यांचे ‘मन’, आणि सौ. सुरेखा नर यांचे ‘धन’ या विषयावर अत्यंत उपयुक्त व्याख्यान झाले. या व्याख्यानांतून आपल्या शरीराची ठेवण, त्याची कार्यपद्धती, हे शरीर म्हणजे आपले पवित्र मंदिर असल्याची महत्ता डॉ. जनार्दन घुगे यांनी सोदाहरण आणि पडद्यावर आकृत्यांच्या माध्यमातून पटवून दिली. मन या विषयावर च्या दुसऱ्या सत्रात वैशाली राणे यांनी अंतर्मन आणि बहिर्मन यांची साद्यंत माहिती देतांना जगाशी बहिर्मनाचे आणि बहिर्मनाचे अंतर्मनाशी असलेले नाते, त्यांची सांगड कशी आहे हे पटवून दिले. सुरेखा नर यांनी धन कसे किती आवश्यक असते ? ते कसे मिळविले पाहिजे ? भ्रष्ट आणि अनैतिक धन, त्याचे दुष्परिणाम याची माहिती देतांना सुरेखाताईंनी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना अक्षरशः खिळवून ठेवले. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे सद्गुरु वामनराव पै यांचे सूत्र आणि हे ईश्वरा ही त्यांची विश्वप्रार्थना याचे महत्त्व प्रत्येक व्याख्यात्यांनी पटवून दिले.
प्रा. नयना रेगे यांनी अत्यंत खुमासदार सूत्रसंचालन केले. महिंद्र आणि महिंद्र या कंपनी तून सेवानिवृत्त झालेल्या चंद्रशेखर सावे यांनी आपल्या सेवानिवृत्ती नंतर पार्टी देण्याऐवजी जीवनविद्या मिशनचे शिबिर सर्व कामगारांसाठी आयोजित करुन एक वेगळा पायंडा पाडला, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया जीवनविद्या मिशनला एक वेगळी उभारी देणाऱ्या ठरल्या.
Marathi e-Batmya