गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीची नवीन सुरुवात फुलपाखरूला लवकरच मिळणार वळण

मुंबई : प्रतिनिधी

‘फुलपाखरू’ या मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीने सध्या छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. मानस-वैदेहीच्या जीवनात सध्या काय घडतंय आणि भविष्यात काय घडू शकतं याचीच चर्चा सध्या घरोघरी सुरू आहे. झी युवा वाहिनीवरील या मालिकेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीच्या जीवनात एका नवीन सुरुवात होणार असल्याचं समजतं. ही सुरुवात मानस-वैदेहीच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारी असेल असंही सांगितलं जात आहे.

‘फुलपाखरू’मध्ये हृता दुर्गुळे ही वैदेहीच्या, तर यशोमान आपटे हा मानसची भूमिका साकारत रसिकांना मोहिनी घालत आहेत. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम… त्यांचा एकमेकांवरचा लटका राग… त्यांची खोडकर मस्ती… थोडे रुसवे-फुगवे… अशी एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस-वैदेहीची प्रेमकथा ‘फुलपाखरू’मध्ये आहे. धुळवडीच्या दिवशी मानस आणि वैदेही एका निसटत्या क्षणी एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आहेत. दोघांच्याही घरून त्यांच्या प्रेमाला सुखद होकारसुद्धा मिळाला असल्याने दोघेही खुश आहेत. सगळं आलबेल असताना अचानक माशी शिंकावी तशी रॉकीने या दोघांमध्ये एन्ट्री घेतली आहे.

मायाचा मित्र असलेल्या रॉकीने दिलेलं चॅलेंज वैदेहीने स्वीकारलं आहे. रॉकीला हरवण्यासाठी मानस आणि वैदेहीने आपल्या मित्रांना घेऊन ‘दोस्ती’ बॅंड सुरु केला आहे. सगळेच नवीन असल्यामुळे त्यांची थोडी धांदल उडतीये, पण तरीही मानस आणि वैदेही सगळ्यांना मॉरल सपोर्ट देत आहेत. आपल्या होणाऱ्या सुनाबाईंचा अपमान सहन न होऊन मानसचे वडीलही त्यांना हवी ती मदत करायला तयार झालेले आहेत. वैदेहीने घेतलेलं चॅलेंज पूर्ण करण्याच्या दृष्टीने मानस बँडसाठी एक नवीन गाणं लिहिणार आहे. गुढीपाडव्याचा दिवशी त्याची इन्सपिरेशन असलेल्या वैदेहीसमोर असताना अचानक मानसला हे गाणं सुचतं. ‘फुलपाखरू’च्या प्रेक्षकांसाठी या नव्या गाण्याची पर्वणी असणार आहे. तिथे माया मानसला वैदेहीपासून वेगळं करण्यासाठी तान्या आणि रॉकीला हाताशी धरून नवनवीन चाली खेळत आहे. मानसचं गाणं हे बँडचं गाणं होऊ शकेल का? या आणि यांसारख्या काही प्रश्नांची उकल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार असल्याचं वाहिनीशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

About Editor

Check Also

पार्श्वगायिका आशा भोसले, यांचा आवाज अखेर कायमचा शांत ब्रीच कँडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका आणि आपल्या अमोघ वाणीने सर्व रसिकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या आशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *