तिसऱ्या टप्प्यात प्रवेश, लॉकडाऊन वाढणार ? मे-जून पर्यत वाढण्याची शक्यता

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी राज्य सरकारने महाराष्ट्र लॉकडाऊन जाहीर केले. मात्र सुशिक्षत असूनही अडाणी व्यक्तीसारख्या वागणाऱ्या नागरिकांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आपण आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या आजाराचा आणखी प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊन जून पर्यत वाढविण्याचे संकेत दिले.

साधारणत: मागील दोन आढवड्यापासून राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. सुरुवातीला हा आजार परदेशी जावून आलेल्या नागरिकांपर्यंतच मर्यादीत होता. मात्र दिवस जसजसे जायला लागले तसे या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. त्यातच मुंबई, पुणे यासह राज्याच्या कोणत्याही झोपडपट्टी असलेल्या भागात या आजार पसरू नये याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येत होती. परंतु मुंबईतील वरळी-कोळीवाडा, धारावी, कांदीवली येथील यासह २४२ ठिकाणी या आजाराचे रूग्ण, संशयित आदींची संख्या वाढत चालेली आहे. पुणे, नागपूर औरंगाबाद, अहमदनगर, बुलढाणा, नांदेड, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील सर्वसामान्य रहात असलेल्या वस्त्यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती निर्माण झाल्याचे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

त्यातच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिल रोजी संपत आहे. नेमक्या याच कालावधीत रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतरही एप्रिल-मे महिना पूर्णपणे लॉकडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सलग हा लॉकडाऊन ठेवायचा कि काही दिवसांची सुट्टी देवून पुन्हा लागू करायचा याबाबत मतमतांतरे असल्याचे त्यांनी सांगितले.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये वाढणाऱ्या रूग्णांची संख्या नियंत्रित करायची असल्यास नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळा असे आवाहन करत कोरोनाला रोखण्यासाठी घरात राहण्याचे अर्थात लॉकडाऊन वाढीचे संकेत दिले आहेत.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक

गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *