ठाण्यातील वादावर मुख्यमंत्री शिंदेंचे जम्मू काश्मीरातून प्रतिक्रिया, गोष्ट फार लहान…

राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आता या सर्व प्रकारावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी ११ जून रोजी काश्मीर दौऱ्यावर असताना श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाण्यातील वादाची गोष्ट फार लहान आहे. तो विषय आता संपला आहे. महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे मला त्यावर अधिक बोलण्याची आवश्यकता वाटत नाही.

डोंबिवलीमधील भाजपाचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाला. यानंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटले. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक नेत्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होत नाही, तोपर्यंत शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा ठराव संमत केला.

यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी काही लोक युतीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप केला. तसेच आपला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली. हा वाद चिघळल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी रविवारी (११ जून) ठाण्यातील मेळाव्यात आक्रमक भूमिका घेतली. तसेच ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.

दरम्यान, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन महाराष्ट्र भवनसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *