राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहिर करण्यात आली. या जागेवर मनसेनेही अमित ठाकरे यांच्याऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली. मात्र महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताच उमेदवार दिला नव्हता. अखेर या मतदारसंघातून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिलिंद देवरा यांना लोकसभा निवडणूकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरुवातीला उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र ऐनवेळी मिलिंद देवरा यांना भाजपाने शिंदे यांच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविले. तसेच दिल्लीतील दरबारी राजकारण करण्याच्या अनुषंगाने काही जबाबदाऱ्याही सोपविल्या. त्यामुळे मिलिंद देवरा हे दिल्लीच्या दरबारी राजकारणात रमतील असे वाटत होते.
दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र जागा वाटपात वरळीची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली. परंतु वरळीच्या मतदारसंघातून शिवसेना उबाठाचे नेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतरही महायुती आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहिर झाला नाही.
अखेर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. मात्र मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीची घोषणा ना पक्षाकडून अधिकृतरित्या जाहिर कऱण्यात आली ना त्यांनी स्वतः केली. मात्र मिलिंद देवरा यांनी एक्सवर सूचक ट्विट करत वरळीकरांना न्याय देणार, वरळीच्या विकासासाठी जीव ओतून काम करणार असल्याचे ट्विटमधून सांगितले.
Chief Minister @mieknathshinde ji believes that justice for #Worli & Worlikars is long overdue.
Together, we're paving the way forward & will share our vision soon.
It’s Worli NOW!
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) October 25, 2024
Marathi e-Batmya