एसटी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांचा संप; २०० डेपोतील एसटीच्या वाहतूकीला ब्रेक शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यावर तोडगा निघेपर्यंत संप सुरुच राहणार

राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यावरती अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीचे निमंत्रक मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर आपल्या गावी जाण्यासाठी आणि किंवा नातेवाईकांच्या गावी जाण्यासाठी एसटी स्थानकावर आलेल्या प्रवाशांना एसटी बससाठी वाट पाहण्याची पाळी आली.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात जवळपास २०० एसटी डेपोतील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून यातील एकाही एसटी डेपोतून एसटी बाहेर पडलेली नाही. याशिवाय प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन थांबविण्यात येणार नसल्याचेही एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

न्याय मागण्याच्या हक्कासाठी एसटी कर्मचाऱ्यांशी संबधित सर्व संघटना आणि कर्मचारी एकत्रित आले असून या कर्मचाऱी संघटनांची एक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीमार्फतच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती कृती समितीचे मुकेश तिगोटे यांनी मराठी ई-बातम्या.कॉम (marathiebatmya.com) संकेतस्थळाशी बोलताना दिली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांशी संबधित संघटनांनी ऐन गणेशोत्सावाच्या तोंडावर पुकारलेला संप मागे घ्यावा असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा मुंबई दौऱ्यात व्यस्त असल्याने त्यांना आज वेळ मिळाला नाही. परंतु उद्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदे चर्चा करतील असे सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *