मुंबईतील नाईट लाईफमधील आगीच्या दुर्घटनांना जबाबदार कोण? राजकीय नेते आणि प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष

मुंबईः प्रतिनिधी

शहरात वाढणारे लोंढे आणि त्यानुसार इथल्या वाढणाऱ्या सामाजिक गरजा यांचा ताळमेळ राखण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबईतील नाईट लाईफ विना अडथळा सुरु ठेवण्यासाठी नुकताच कायदा पारीत केला. विशेष म्हणजे हा कायदा पारीत होण्याच्या एक दोन दिवस आधी आणि त्यानंतर काही दिवसातच मुंबईती दोन आगीच्या दुर्घटना घडत २९ जण मृत्यूमुखी तर २० जण जखमी झाल्याने या दुर्घटनेस जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे.

मुंबईत दिवसा काम करणाऱ्या नागरीकांबरोबरच रात्रीही काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रात्रीचे काम करणाऱ्या या व्यक्तींसाठी रात्रीची दुकाने, हॉटेल-रेस्टॉरंट, मॉल सारखी आस्थापना सेवा सुरु करण्याची मागणी सर्वात आधी शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी केली. त्यास सुरुवातीला विरोध करणाऱ्या भाजपच्या आशिष शेलार यांनीही कालांतराने त्यास होकार देत इमारतींच्या टेरेसवर हॉटेल-रेस्टॉरंट सुरु करण्याची मागणी उचलून धरली.

राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आणि भाजपच्या नेत्यांनीच ही मागणी केल्याने राज्य सरकारने यास कायद्याच्या चौकटीत बसवित त्यास मान्यता दिली. परंतु ज्या ठिकाणी रात्रीची हॉटेल्स, रेस्टॉरंट जी विशेषतः इमारतीच्या टेरेसवर किंवा गजबजलेल्या ठिकाणी सुरु असतात त्यांच्या सुरक्षा उपाय योजनांच्या मुद्याकडे सोयीस्करपणे सर्वच यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील साकिनाका परिसरातील फरसाण मार्टला अशीच पहाटेच्यावेळी आग लागून १५ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ लोअर परळ येथील मोजो रेस्ट्रो पबला आग लागून १४ जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे एकाबाजूला सुरक्षेच्या उपाययोजनांना फाटा देवून अशा हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या दुर्घटनात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरीकांच्या मृत्यूची जबाबदारी कोणावर असा सवाल दादर येथील बँक व्यावसायिक असलेल्या राजशेखर घाडगे यांनी केला.

याबाबत राज्याचे कामगार मंत्री तथा दुकाने व आस्थापना कायद्याचा पाठपुरावा करणारे संभाजी निलंगेकर पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून सांगण्यात आले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *