मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे त्वरित स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले.

विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

१९९५ च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती देण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले.

कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेमध्ये असून या ठिकाणी १७ हजार २०० घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीस किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच मीठी नदी पात्रात काही घरे आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *