वर्षा गायकवाड यांचा आरोप, बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ करून सरकारकडून मुंबईकरांची लुट बेस्टला संपवण्याचा भाजपा सरकार व बीएमसीचा हेतू, आर्थिक नुकसानीस वेट लीज खासगीकरण मॉडेल जबाबदार

भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये आधीच महागाईने कहर केला आहे, सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले असताना सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. महागाईने होरपळत असलेल्या मुंबईकरांवर बेस्ट बसच्या तिकिटदरात दुप्पट वाढ करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मुंबईकरांचा या भाडेवाढीस विरोध असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांची लुट सुरु केली आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गाकवाड यांनी केला.

बेस्ट बसच्या भाडेवाढीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, बेस्ट बस ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे, दररोज ३१ लाखांहून अधिक मुंबईकर बेस्टच्या बस सेवेवर अवलंबून आहेत. माफक दरात ही सेवा सुरु असताना भाडेवाढ करुन सामान्य मुंबईकरांवर अधिकचा बोजा टाकला आहे. मुंबईला विश्वासार्ह, परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा हवी आहे आणि ती फक्त बेस्टच देऊ शकते. बेस्ट सक्षम करण्यासाठी वेट लीज खासगीकरणाचे मॉडेल तातडीने रद्द करावे, बेस्टचे डेपो खासगी विकासकांच्या घशात घालू नये, बेस्टच्या मालकीच्या बसेस वाढवल्या पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा आहे, नफ्याचा धंदा नाही, अशी आठवणही यावेळी करून दिली.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बेस्ट उपक्रमाला होणारा आर्थिक तोटा पाहता भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात असले तरी बेस्टचे आर्थिक नुकसान होण्यास राज्य सरकार व बीएमसीच जबाबदार आहे. बेस्टच्या समस्या वेट लीज खासगीकरणाच्या अपयशी मॉडेलमुळे निर्माण झाल्या आहेत पण भाजपा युती सरकार ते रद्द करण्यास तयार नाही. सरकार व बीएमसीचा हेतू हा बेस्टला संपवण्याचा आहे. आता तर भाजपा सरकार बेस्टचे डेपोही उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस सेवा आज मुद्दाम कमकुवत केली जात आहे. बेस्टला केवळ फीडर सेवेत रूपांतरित करण्याचा डाव रचला जात आहे. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार असल्याची भीतीही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम २०२६च्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *