थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोले म्हणाले, शुभेच्छा, त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो माध्यमांशी थोरात बोलत असतील तर त्यांनीच विचारावं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो अशा सकाळीच शुभेच्छा दिल्या. तसेच थोरात यांनी राजीनामा दिला असं काहीही झालेलं नाही असे सांगत कानावर हात ठेवले.

नाना पटोले म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

कार्यकारणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते, असं असताना काही लोक तर वर्ष वर्ष घेत नव्हते. मात्र, आमची मागील महिन्यातच नागपूरमध्ये प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली होती. आता पुन्हा १३ फेब्रुवारीला अशीच एक बैठक होणार आहे. त्यात या पोटनिवडणुकींची रणनीती बनवणं, आत्ताच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात विजयी आमदारांचा सत्कार आणि राहुल गांधींबरोबर कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असं चाललेले यात्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

१३ फेब्रुवारीच्या कार्यकारणी बैठकीत पक्षातील घडामोडींवरही चर्चा केली जाईल. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत, असेही नाना पटोलेंनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात आमच्याशी अजून बोलतच नाहीत. माध्यमांशी बोलत असतील तर माध्यमांनी त्यांना राजीनामा दिला का हे विचारावं. त्यांची तब्येत चांगली नाही. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. काल पुण्यात उमेदवारांचे अर्ज भरताना सर्वच नेते आले होते. त्यात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेस होता. त्यावेळी बाळासाहेब थोरातांनीही यावं अशी आमची अपेक्षा होती, असेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना

नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *