राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, महाविकास आघाडी एक टोळी, घरोबा एकाबरोबर तर… शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडी उघडपणे पाठिंबा देत नसल्याचा आरोप

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एक टोळी आहे. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उघडपणे पाठिंबा दिला जात नाही, अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याबाबत विचारलं असता महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, खरं तर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही एक टोळी आहे. मविआ कुठल्याही विचारसरणीवर, विचारधारेवर किंवा तत्त्वावर एकत्र आलीच नव्हती. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, ही महाविकास आघाडीची अवस्था आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन निवडून आली. नंतर ते महाविकास आघाडीसोबत गेले. त्यामुळे ते टिकले नाहीत.

अनेक मुद्यांवरून शिवसेनेची मागील २५ वर्षांपासून भाजपासोबत युती होती. आता शिवसेनेच्या ठाकरे सेनेनं हिंदुत्वापासून पूर्ण फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण विचारधारा नसलेली मंडळी जेव्हा एकत्र येते, मग सत्तेची समीकरणं कशी आहेत? कोण कशा पद्धतीने वागतो, याचा अधिक विचार होतो, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *