पुणेः प्रतिनिधी
एक वर्षापूर्वी पुण्यात एल्गार परिषद झाली. त्यानंतर भीमा कोरेगांव येथे दंगल झाली. मात्र यासंपूर्ण प्रकरणात पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह असून त्यांच्याकडून अधिकाराच गैरवापर झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.
केवळ नक्षलवादाच पुस्तक सापडलं म्हणजे कोणी नक्षलवादी ठरू शकत नाही. माझ्याही घरात नक्षलवादाच पुस्तक आहे. आम्हीही यासंदर्भातील माहिती घेत असतो. त्यामुळे हा काही गुन्हा ठरू शकत नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र लढ्याच्यावेळीही अशा घटना घडल्या. मात्र त्यावेळी राष्ट्रद्रोहाचा खटला कोणी दाखल केला नाही. तसेच अटक करण्यात आलेल्यांना समाज बुध्दीमान वर्ग म्हणून ओळखतात असे सांगत भीमा कोरेगांव प्रकरणी अटकेत असलेल्या साहित्यिक-लेखकांची पाठराखण केली.
यावेळी नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा काव्यसंग्रहाचा संदर्भ देत ढसाळांनी त्यांच्या कवितेतून असंतोष मांडला. तसेच सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या केवळ दोन ओळीसाठी त्यांना तुरूंगात डांबण्यात आल्याचे कृत्य म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Marathi e-Batmya