मुंबई : प्रतिनिधी
ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला दिला. या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते पत्रकार परिषदेत सांगत होते. केंद्राने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपये दिले. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो. ते बंधनकारक असते. ते दिलेले पैसे नवीन योजनेसाठी खर्च करत नाही. पॅकेज दिले हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्य सरकारला झालेला नाही. बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे असा सल्ला देवेंद्र फडणवीस देत आहेत. लोकं जगात, देशात, महाराष्ट्रात कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. तो त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.
आम्ही महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करणार नाही असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होवू शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत. हे पण खरे आहे की, दिल्लीपासून महाराष्ट्रातील भाजपाचे लोक हे सरकार पडणार आहे. आम्ही सरकार बनवणार आहोत. राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार असून एकजुटीने आम्ही काम करतोय. भाजपाने कितीही अफवा पसरवल्या तरी सरकार स्थिर राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Marathi e-Batmya