मुंबई : प्रतिनिधी
कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणं हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे. दरम्यान आपला फोकस कामावर असला पाहिजे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल अशी मिश्किल टिका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.
आज पुन्हा एकदा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जनतेशी फेसबुकवरुन संवाद साधला.
लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे असं वैयक्तिक मत मांडतानाच हे अनलॉकिंग कॅफे किंवा कॉफी डे मध्ये जाण्यासाठी नाही तर काम करुन आपण नियम व कायदे पाळू. देशाला आज कामाची गरज आहे. काम व कष्ट करून आपलं राज्य व देश उभा करण्याची वेळ आहे. नुसतं घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जी दिशा देतील. सरकार जे नियम व कायदे बनवेल त्याचे पालन करावे. हे नियम व कायदे सरकारसाठी नाही तर आपल्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री व माननीय दादा जो निर्णय घेतील तो निर्णय मिलिटरीच्या शिस्तीप्रमाणे पालन करा असे आवाहनही त्यांनी केले.
आज राज्य व देश बांधण्याची… कष्ट करण्याची… एकमेकांचे हात धरण्याची… विचारांची लढाई लढण्याची व कष्ट करण्याची वेळ आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. माझ्या पक्षाचे लोक चांगलं काम करत आहेत त्यांचं कौतुक करणारे पोस्टिंग करण्याचे सरकारने नियम केल्यावर बंद केले. आज ४० दिवस झाले मी घराबाहेर पडलेली नाही. मी सरकारचे नियम तंतोतंत पाळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जितक्या लवकर नियम पाळू तितक्या लवकर लॉकडाऊन उठेल तेवढ्या लवकर आर्थिक अडचणीवर मात करु शकू. आपलं राज्य पायावर उभं कसं राहिल, आज आपल्यासमोर काम करुन आपली आर्थिक स्थिती जाग्यावर आणण्यासाठी काम केलं पाहिजे. आरोग्य व आर्थिक स्थिती यांच्यातील सुवर्णमध्य साधूनच आपल्याला पुढे जावे लागेल असे सांगतानाच आज अन्न वाटतोय पण आता त्यांना अन्न नकोय तर हाताला काम हवं आहे. शिजवून दिलेलं अन्न नकोय तर रेशन हवं आहे. दहा दिवसाचं रेशन दिलं तर ती लोकं दहा दिवस घराबाहेर पडणार नाहीत. शिवाय प्रशासनावरील ताणही कमी होईल त्यामुळे शक्यतो रेशन कीट देणंच महत्वाचं असल्याचा सल्लाही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्रात थुंकणे थांबवण्यासाठी एक मोहीम राबविण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. शिवाय टीबी आजारामुळे वर्षाला १५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी सांगितली. या आजारावर उपचार आहेत तरी इतके लोक प्राण गमावत आहेत. तर दुसरीकडे कोरोनावर अजून लस आलेली नाही. एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आज कोरोना लढ्यात २४ तास प्रशासन काम करत आहे. त्यांचा अभिमान बाळगतानाच या सर्व योगदानाबद्दल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सर्वांना मानाचा मुजरा केला. बलिदान दिलेल्या पोलिसांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कुटुंबाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. त्यांच्यासोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. गरोदर मातांना किंवा तिच्या लेकराला वेळेवर मदत मिळालीच पाहिजे. त्यांच्यासाठी काही निर्णय सरकारला घेता येतात का हे पहावे आणि तसा प्रयत्न करावा अशी मागणीही त्यांनी केली.
समाजातील अनेक घटक आज अडचणीत आहेत याची जाणीव सरकारला आहे. केंद्र व राज्य सरकार यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तुमच्या सगळ्यांची साथ या लॉकडाऊनमध्ये जशी आहे तशीच साथ लॉकडाऊन उठल्यावर द्याल व येत्या काही दिवसात महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा राहून अडचणीवर मात करुया असा विश्वास व्यक्त करत देशात महाराष्ट्राला पुन्हा अव्वल नंबरवर नेवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपण हे युद्ध जिंकणारच आहोत. येत्या आठ – दहा दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माननीय दादा ज्या काही गाईडलाईन्स देतील त्याचे तंतोतंत पालन करा असे आवाहनही त्यांनी केले.
Marathi e-Batmya