रत्नागिरी (दापोली) : प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जगातील ऑक्सफर्डसह इतर नामांकित विद्यापाठांनी त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती कदाचित राज्यपाल महोदयांना जास्त असेल असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समर्थन केले.
राज्यावर आलेल्या संकटामुळे राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याप्रश्नी तीव्र नाराजी व्यक्त करत पत्र पाठवून परिक्षा घेण्याची सूचना राज्य सरकारला केली. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे समर्थन केल्याने या संभ्रमात आणखीनच वाढ झाली आहे.
यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला तर भारतातील नामांकित विद्यापीठे, तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील तर शासनाने घेतलेला निर्णय त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं असं नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते असल्याचे सांगत राज्यपालांना टोला त्यांनी टोला लगावला.
रत्नागिरी येथील निसर्ग वादळाने झालेल्या नुकसानीचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
फळबागा, शेती, घरे याची नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आंबा, नारळ, सुपारी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देताना पुढील ७ – ८ वर्षाचा विचार करून द्यायला हवी असेही शरद पवार म्हणाले.
बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहे. त्या बागायती जमीनी साफ करायची देखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya