खाते मिळताच सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय, आता हॅलो नाही तर वंदे मातरम म्हणायचं निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव म्हणून हे वर्ष साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधत राज्याचे नव्याने सांस्कृतिक कार्यमंत्री झालेले सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा निर्णय घेत आता आता राज्यातील सर्व शासकिय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी फोनवर बोलताना हॅलो असे बोलून सुरुवात करण्याऐवजी वंदे मातरम म्हणून बोलण्यास सुरुवात करायची असे जाहिर केले.

त्यामुळे आगामी काळात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार याचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. तसेच या निर्णयाला अनेक कर्मचारी-संघटना यांचा विरोध होण्याची शक्यता आहे.

हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

या निर्णयाची घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ऊर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करतोय असेही ते म्हणाले.

आता हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ने संभाषण सुरु करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला आहे. सांस्कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नव्या सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या निर्णयामुळे मंत्रालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आतापर्यत भाजापावाले काय खायचे हे शिकविण्याचा प्रयत्न करत होते आता काय बोलायचे हे ही आम्हाला शिकविणार का? असा संतप्त सवाल करत आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडून या संदर्भात आदेश जारी झाल्यानंतर आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडू असेही अधिकाऱ्यांच्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *