महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात चेहरा उद्धव ठाकरेः वंचित म्हणते आधी प्रस्तावावर चर्चा

आगामी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे निवडणूकीच्या प्रचारात आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर भारतातील सर्व राज्यांसह पश्चिम बंगाल राज्यातही भाजपाकडून प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील जागा वाटपाबाबत भाजपाने अद्याप पत्ते उघड केले नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चेच्या फेऱ्या अद्यापही पार पाडल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूका या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर लढविण्याबाबत वंचित वगळता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी म्हणतात आम्ही दिलेल्या प्रस्तावावर अद्याप ठोस आश्वासन मिळत नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात काल चर्चा झाली. तत्पूर्वी शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. त्यानुसार आज महाविकास आघाडीची बैठक वरळी येथील फोर सीजन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला चारही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत चारही पक्षांच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा झाली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी पक्षाच्या बैठकीत सकारात्मक पध्दतीने ४८ जागांवर चर्चा झाली. तसेच या बैठकीत चारही पक्षांचे सूर जुळल्याचे दिसून आहे. आजच्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही. परंतु पुढील बैठक ९ मार्च रोजी होणार असून त्या बैठकीत प्रमुख नेत्यांकडून जागा वाटपाबाबतचा निर्णय होऊन जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावावर मविआच्या नेत्यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. विशेषतः वंचितने दिलेल्या प्रस्तावातील भाजपाबरोबर निवडणूकीनंतर कोणी जाणार नाही, कोणतीही छुपी युती भाजपाबरोबर करणार असे लेखी आश्वासन सर्वांनी जाहिर करावे, त्याचबरोबर ओबीसी समाजाचे १५ उमेदवार निवडणूकीत द्यावे, अल्पसंख्याक समाजाचे ३ उमेदवार द्यावेत, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा देण्याचा निर्णय घेतला आहे यासह कोणत्याच प्रस्तावावर महाविकास आघआडीकडून अद्याप ठोस उत्तर दिले नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थात महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून ठरविला आहे. या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता राज्यात अद्यापही असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी लोकसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाने मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ जागा देण्यावर एकमत झाले आहे. तर काँग्रेसने १६ ते १८ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून ६ ते ८ जागांवर उमेदवार देण्याची आणि जिंकण्याची तयारी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीला २ जागा देण्याबाबत महाविकास आघाडीने निर्णय घेतला असल्याची माहिती महाविकास आघाडीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *