नाना पटोले यांची टीका,… माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या शिंदे व फडणवीसांनी सत्तेतून पायउतार व्हावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या ८ महिन्यातच तो पुतळा कोसळला, हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळाला. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नरेंद्र मोदींनी माफी मागितली याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केली आहे, पण महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना माफ करणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा खरपूर समाचार घेत पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी घाईघाईने महाराजांचा पुतळा बसवला. वास्तविक पाहता महापुरुषांचा भव्य पुतळा उभारताना सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो परंतु भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे पुतळ्याचे काम दिले. पुतळ्यासंदर्भात सांस्कृतिक विभागाने दिलेल्या सुचनांकडे कानाडोळा केला व परिणामी निकृष्ठ दर्जाचे काम केले म्हणून पुतळा कोसळला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी घेऊन सत्तेतून पायउतार झाले पाहिजे अन्यथा जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विरोधकांनी राजकारण करु नये या एकनाथ शिंदे व फडणवीसांच्या आवाहनाला उत्तर देत नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. केवळ मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला भाजपा कोणत्याही विषयाचे राजकारण करते. मविआचे सरकार खाली खेचण्यासाठी काय काय प्रकार केले हे देशाने पाहिले आहे, त्यामुळे दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पहावा असा टोलाही लगावला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *