राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, मुंबईसह मोठ्या शहरांत बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढीसाठीही शासन प्रयत्नशील आहे. विभागाकडील पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागात अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही सांगितले.
सुगंधित सुपारी प्रश्नाच्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
Marathi e-Batmya